Sunday 25 March 2012

निर्यातबंदीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

चंद्रपूर) - कपाशीची देशांतर्गत उपलब्धता वाढावी, यासाठी केंद्र सरकारने नुकतीच कापूस निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकाला आज उतरती कळा लागली आहे.

सरकारने कापसाला अतिशय अल्प हमीभाव दिल्याने शेतकरी हवालदिल असतानाच आता निर्यातबंदी घातल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. सद्य:स्थितीत हजारो क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात विक्रीविना पडून आहे.

कापसावरील निर्यातबंदीचा आदेश खासगी व्यापाऱ्यांच्या कानावर पडताच व्यापाऱ्यांनी कापूस विक्रीच बंद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने कपाशीच्या पिकामध्ये यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर जिल्हा अग्रेसर आहे. चंद्रपूर जिल्हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीचे उत्पादन घेतात. यावर्षीच्या अल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच कंबडेच मोडले होते. त्यात लाल्या रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे यावर्षी अपेक्षित एकरी उत्पादनही झालेले नाही.

आधीच महागाईने होरपळलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी वाढलेली मजुरी, महागडी खते, औषधे, बियाणे या बाबींचा सामना करावा लागला. अलीकडे मजूरही मिळणे दुरापास्त झाले आहे. या सर्व अडचणींवर मात करीत कपाशीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना कपाशीला भाव मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांच्या डोळ्यात आसवे उभी राहू लागली आहेत. यावर्षी कपाशीची वेचणी प्रतिकिलो 10 रुपये दर देऊन करावी लागली. या सर्व खर्चाची बेरीज केली, तर उत्पादन खर्चाच्या मानाने उत्पन्नाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

सुरवातीला खासगी व्यापाऱ्यांकडून चार हजार रुपयांपर्यंत भाव दिला जात होता. आता हा दर देण्यास कुणीच तयार नाही. त्यामुळे उत्पादनखर्च काढायचा कसा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. अडचणीत असल्याने सध्या शेतकऱ्यांना अल्पदरात कापसाची विक्री करावी लागत आहे.

शेकडो क्विंटल कापूस पडून
निर्यातबंदी लादल्याने कपाशीच्या पिकाचा भाव 500 रुपयांनी घटून तीन हजार 300 रुपयांपर्यंत कमी झाल्याने शेतकरीवर्गात नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी निसर्गाने फिरविलेली पाठ, सरकारने न दिलेला योग्य हमीभाव व त्यात सरकारने घातलेल्या निर्यातबंदीने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावकाराचे पाय धरण्याची वेळ आली आहे. आजही प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरामध्ये 60-70 क्‍विंटल कापूस साठवून आहे. कमी भावात पांढऱ्या सोन्याची विक्री करण्यास शेतकरीवर्ग तयार नाही; परंतु घरात असलेले अठराविश्‍व दारिद्य्र पाहता कापसाची विक्री करणे गरजेचे आहे. तेव्हा कापसावरील निर्यातबंदी लवकर उठवून योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
संबंधित बातम्या

No comments:

Post a Comment