Sunday 25 March 2012

वाघोबांनी अडविली प्रधान वनसचिवांची वाट

 
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 28, 2012
चंद्रपूर - सध्या वाघांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. आपली ही समस्या सांगायची तरी कुणाला आणि कशी, असा प्रश्‍न कदाचित वाघांनाही पडला असावा. मात्र, ताडोबातील वाघांनी यावर उपाय शोधला आणि चक्क प्रधान वनसचिवांचा ताफा अर्धा तास अडविला. वनसचिवांकडे जणू ते आपली कैफियतच मांडत आहेत, असे ते दृश्‍य होते. या अनोख्या भेटीने कदाचित सचिव महोदय भारावले असावे. वाघांनी तर आपले काम केले. आता वाघांच्या प्रश्‍नावर उपाययोजना करायची की नाही, याचा निर्णय सचिवांनी घ्यायचा आहे.

पुनर्वसित कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश देऊन परत येणाऱ्या वाहनांचा ताफा अडवून ताडोबाच्या राजाने अधिकाऱ्यांची "थेटभेट'च घेतली. अर्धा तास वाट अडवून दोन बछड्यांनी जणू रस्त्यावर ठिय्याच मांडला होता. वाघांची घटती संख्या आणि नागरी वस्तीचे अतिक्रमण, याचीच चिंता जणू हे बछडे मांडत असावेत. ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जामनी या गावाचे पुनर्वसन होत असल्याने या गावातील लाभार्थ्यांना रविवारी (ता. 26) आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, अनिलकुमार सक्‍सेना, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे, ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनयकुमार सिन्हा, उपजिल्हाधिकारी ठाकरे, उपवनसंरक्षक संजय ठवरे आदी अधिकारी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांचा ताफा ताडोबाच्या दिशेने निघाला. सायंकाळी चारच्या सुमारास ताफा पांढरपौनीजवळ आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध वाघाचे दोन बछडे रस्त्यावर बसले होते. लालमातीच्या या वाटेवर ते बागडत होते. अधिकाऱ्यांचा ताफा जवळ येताच ते क्रोधित झाले. शेकडो जणांच्या उपस्थितीत ते जराही मागे सरकले नाहीत. सध्या ताडोबात रिसॉर्ट आणि मानवी वस्तीचा प्रश्‍न "आ' वासून उभा आहे. मानवी वस्ती दूर करण्यासाठी पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे; मात्र रिसॉर्टला परवानगी दिली जात असल्याने वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. याच पार्श्‍वभूमीवर या बछड्यांनी वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांची भेटच जणू घेतली असावी. सुमारे अर्धा तास त्यांनी वाट अडवली. हा क्षण टिपण्यासाठी अधिकाऱ्यांचा मोह अनावर झाला होता. अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील कॅमेरातून वाघाच्या छबी टिपल्या.

सचिवांना मुंबईला जायचे असल्याने ते घाईत होते. मात्र, त्यांच्या घाईशी वाघोबांना काही करायचे नव्हते. आधी आमचे ऐका, नंतरच पुढे जा, अशा आविर्भावात जणू वाघांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. तोपर्यंत ताडोबात सफारीला आलेल्या पर्यटकांनी दोन्ही बाजूंनी गर्दी केली. सचिव प्रवीण परदेशी यांची जिप्सी अगदी वाघांच्या समोर होती. त्यांनीही वाघांची छायाचित्रे काढली. वाघांचा हा स्वयंघोषित रास्तारोको संपल्यानंतरच परदेशींना पुढच्या प्रवासाला जाता आले.
प्रतिक्रिया
On 29/02/2012 08:57 AM Adv. khyati shah said:
ह्या व्यतिरिक्त त्यांच्या जवळ कुठला अजून पर्याय होता का? ह्यावरून तरी प्रधान वन सचिवांना कळायला हवं, त्यांनी काय करायला पाहिजे ते.
On 28/02/2012 11:11 AM Gaurishankar Patane said:
गारहाणे मांडण्या साठी रस्ता रोको हा एकच पर्याय आहे आहे कामगार संगठनाने, राजकीय पुढार्याने त्यांना शिकवले कि काय ?

निर्यातबंदीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार

चंद्रपूर) - कपाशीची देशांतर्गत उपलब्धता वाढावी, यासाठी केंद्र सरकारने नुकतीच कापूस निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकाला आज उतरती कळा लागली आहे.

सरकारने कापसाला अतिशय अल्प हमीभाव दिल्याने शेतकरी हवालदिल असतानाच आता निर्यातबंदी घातल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. सद्य:स्थितीत हजारो क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात विक्रीविना पडून आहे.

कापसावरील निर्यातबंदीचा आदेश खासगी व्यापाऱ्यांच्या कानावर पडताच व्यापाऱ्यांनी कापूस विक्रीच बंद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने कपाशीच्या पिकामध्ये यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर जिल्हा अग्रेसर आहे. चंद्रपूर जिल्हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील शेतकरी नगदी पीक म्हणून कपाशीचे उत्पादन घेतात. यावर्षीच्या अल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच कंबडेच मोडले होते. त्यात लाल्या रोगाचे आक्रमण झाले. त्यामुळे यावर्षी अपेक्षित एकरी उत्पादनही झालेले नाही.

आधीच महागाईने होरपळलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी वाढलेली मजुरी, महागडी खते, औषधे, बियाणे या बाबींचा सामना करावा लागला. अलीकडे मजूरही मिळणे दुरापास्त झाले आहे. या सर्व अडचणींवर मात करीत कपाशीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना कपाशीला भाव मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांच्या डोळ्यात आसवे उभी राहू लागली आहेत. यावर्षी कपाशीची वेचणी प्रतिकिलो 10 रुपये दर देऊन करावी लागली. या सर्व खर्चाची बेरीज केली, तर उत्पादन खर्चाच्या मानाने उत्पन्नाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

सुरवातीला खासगी व्यापाऱ्यांकडून चार हजार रुपयांपर्यंत भाव दिला जात होता. आता हा दर देण्यास कुणीच तयार नाही. त्यामुळे उत्पादनखर्च काढायचा कसा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. अडचणीत असल्याने सध्या शेतकऱ्यांना अल्पदरात कापसाची विक्री करावी लागत आहे.

शेकडो क्विंटल कापूस पडून
निर्यातबंदी लादल्याने कपाशीच्या पिकाचा भाव 500 रुपयांनी घटून तीन हजार 300 रुपयांपर्यंत कमी झाल्याने शेतकरीवर्गात नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी निसर्गाने फिरविलेली पाठ, सरकारने न दिलेला योग्य हमीभाव व त्यात सरकारने घातलेल्या निर्यातबंदीने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सावकाराचे पाय धरण्याची वेळ आली आहे. आजही प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरामध्ये 60-70 क्‍विंटल कापूस साठवून आहे. कमी भावात पांढऱ्या सोन्याची विक्री करण्यास शेतकरीवर्ग तयार नाही; परंतु घरात असलेले अठराविश्‍व दारिद्य्र पाहता कापसाची विक्री करणे गरजेचे आहे. तेव्हा कापसावरील निर्यातबंदी लवकर उठवून योग्य भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
संबंधित बातम्या

अत्यल्प खर्चात फुलविली संत्र्याची बाग

चंद्रपूर - पंचवीस वर्षांपूर्वी नऊ रुपये दराने संत्र्यांची 140 रोपे खरेदी केली. यातील 45 झाडे मेली; पण 95 झाडे आजही डौलात उभी आहेत. अत्यल्प खर्चात वरोरा तालुक्‍यातील चिनोरा येथील आनंदराव देऊळकर यांनी फुलविलेली संत्र्यांची बाग आता त्यांच्या जगण्याचे साधन झाली आहे.

आधुनिक युगात शेती परवडत नाही, म्हणून ती पडीक आणि अकृषक करून बांधकामासाठी विकली जाऊ लागली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीकडे दुर्लक्ष केले जात आहे; मात्र 25 वर्षांपूर्वी वरोरा तालुक्‍यातील चिनोरा येथील आनंदराव देऊळकर यांनी केवळ एक हजार 260 रुपये खर्चून संत्र्यांची बाग फुलविली. नऊ रुपयेप्रमाणे त्यांनी 140 रोपे खरेदी केली. यातील 95 झाडे जगली. आज ती मोठी झालीत. दरवर्षी संत्र्याचे चांगले उत्पादन होते. एक एकर शेतात लावलेल्या या बागेत गांडूळ खत आणि शेणखताच्या वापरातून फळ आणि फुलांची शेतीही फुलू लागली आहे. 25 वर्षांपूर्वी पहिल्या दोन वर्षांत पाच हजार रुपये खर्च झाले; मात्र तिसऱ्या वर्षीपासून मेहनतीला फळ मिळाले. वर्षाला दोन ते तीन लाखांचे उत्पादन होत आहे. ही संत्री नागपूर, वरोरा आणि चंद्रपूरच्या बाजारात विक्रीसाठी ते पाठवितात. झेंडू फुलांची लागवड करण्यात आली असून, उर्वरित शेतात नवीन प्रयोग करण्याचा त्यांचा मानस आहे. संत्र्यांच्या दोन झाडांत दोन ते तीन फूट अंतर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मधोमध फुलांची शेती करण्यात आली. आनंदरावांकडे एकूण सात एकर शेती असून, उर्वरित सहा एकरांमध्ये चना, सोयाबीन, भाजीपाला, धान, गहू आदी पिके घेतली जातात. यातून वर्षाला लाखोंचे उत्पादन होत आहे.

चंद्रपूर जिल्हा भौगोलिक क्षेत्र

जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र :-  १०,७९३.०९ चौ.कि.मी.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण व पूर्वभागात १८.४ ते२०.५ याउत्तर अंषावर व ७८.५ ते ८०.६ टक्केया पूर्णरेखांष या भौगोलिक पट्टयात बसला आहे.

जिल्ह्यातील ८० टक्के लोक शेतीवरच आपली उपजिविका करतात. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात भात हे प्रमुख पिक आहे. इतर भागात सोयाबीन, ज्वारी, कापूस तूर ही पिके प्रमुख आहेत. वर्धा, इरई, अंधारी, वैनगंगा, पैनगंगा, बारमाही वाहणा-या नद्या आहेत. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यामुळेशेतजमीन सुपीक बनली आहे.
तलाव :- जिल्हयात एकुण १६७८ माजी मालगुजारी तलाव असून मध्यम तलाव ७ आहेत.  नलेश्‍वर, चारगांव, आसोलामेंडा, लभानसराड, अमलनाला, चंदईनाला, घोडाझरी या तलावामुळे मत्स्यव्यवसाय मोठयाप्रमाणात होतो. ० ते१०० हेक्टर चे८० लघुपाटबंधारे तलाव आहेत.

वन :- जिल्हयात सर्वच तालुक्यात वनक्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहेत.  जिल्हयातील ३,५०,२०० हेक्‍टर क्षेत्र वनाखालील असनू त्याचा जिल्हयाच्या एकुण भूक्षेत्राची ३२.०६ इतकी टक्केवारी आहे.

हवामान व पर्जन्य  :- चंद्रपूर जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळयात दमट असते. उन्हाळयात तापमान जास्त असते. जिल्हयात पावसाचे प्रमाण जास्त असुन सिंदेवाही, ब्रम्हपुरी, नागभीड, मूल, पोंभुर्णा, सावली इत्यादी तालुक्यात पाऊस जास्त पडतो.  जिल्हयाचे सर्वसाधारण  पर्जन्यमान १३०९.५० मि.मि. आहे.
 
जलसिंचन :- कोल्हापूरी बंधारे ५५१ सिंचन क्षमता १९३०० हेक्टर, जवाहर विहिरी ६५३४, इतर विहिरी १९३५,तेलपंप ४७७६, विजपंप १२८७१०.
 
ग्रामीण व नागरी लोकसंखेचेप्रमाण :- जिल्हयाच्या एकुण लोकसंख्यापैकी ७३.०७ टक्के लोक ग्रामीण भागात तर २६.९३ टक्के शहरात राहतात.

अनुसुचित जाती जमाती :- २००१ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील एकुण लोकसंख्येत अनुसुचित जाती प्रमाण १४.३ टक्केअसून अनुसुचित जमातीचेप्रमाण १८.१ टक्के आहे.

कामगार :- २००१ चे जनगणेनुसार जिल्हयातील एकुण कामगारांची संख्या ९,३०,७९१ आहे. काम करणा-यापैकी २५.७ शेतकरी, ३९.३ शेतमजूर , २.२ घरगुती उद्योग व ३२.९ टक्‍के इतर सेवेत.

भूधारक  :- १९९०.९१ च्या कृषि गणनेच्या माहितीनुसार जिल्हयात  एकुण २,०१,५०० भूधारक  असून एकुण शेतजमीन ५२००८१ हेक्टर आहे.

पिकपध्दती :- जिल्हयातील २००४-२००५  मधील एकूण पिकाखाली असणा-या ५,३९,८०० हेक्टर क्षेत्रापैकी खरीप हंगामात तृणधान्य पिकाखाली क्षेत्र १२९७७९ हेक्टर, कडधान्य पिकाखाली २४४५५ गळीत धान्यपिकाखाली १४८३१५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

महत्वाचे उद्योग :- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे :- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी

कुष्ठरोग्यांच्या मातीत अद्रकाची शेती


देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर- कुष्ठरोग्यांना विविध प्रयोगशील उद्योगातून जगण्याचा मार्ग दाखविणारे ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवनात शेती हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. यंदा भात, सोयाबीन आणि कापूस या पारंपरिक पिकांमध्ये गुरफटलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना वरदान ठरावा, असा "अद्रका'च्या शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन आणि कापूस या तीन मुख्य पिकांपलीकडे शेती केलेली नाही. निसर्गावर अवलंबून असलेल्या या पिकांमुळे अनेकदा शेतकऱ्यांना नैसर्गिक अवकृपेला सामोरे जावे लागते. तरीही येथील शेतकरी त्याच पिकांची लागवड करतात. या परंपरेला फाटा देत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी अद्रकाची शेती करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार, आनंदवनचे कृषी विभागप्रमुख रामकृष्ण साटोणे यांनी काही सहकाऱ्यांसोबत साताऱ्याला जाऊन अद्रकाच्या शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर मागील जुलैमध्ये याचा प्रयोग सुरू झाला. 10 एकर शेतीवर एक-एक फुटावर अद्रकाची गाठ जमिनीत पेरण्यात आली. योग्य काळजी घेतल्यानंतर चालू मार्च महिन्यात अद्रकाचे पीक आले आहे. जमिनीची नांगरणी करून जमिनीत दडलेल्या या अद्रकाची आता काढणी होत आहे. पहिल्याच वर्षी दहा एकरांत भरघोस पीक निघाले आहे.



अद्रकाच्या शेतीसाठी मंत्र

आल्याच्या पिकासाठी माती भुसभुशीत हवी. रेताळ जमीन असेल, तर अधिक उत्तम. कमी पाण्यातही ठिबक सिंचनाद्वारे हे पीक घेता येऊ शकते. याशिवाय खर्चाच्या तुलनेत फायदा अधिक असल्याने शेतकऱ्यांसाठी ही शेती फायद्याचीच आहे. या पिकासाठी प्रतिएकरी लागवड खर्च 35 ते 45 हजार एवढा आहे. मात्र, त्या तुलनेत मिळणारा फायदा हा एक लाखापर्यंतचा आहे. एकरी सुमारे 70 ते 90 क्विंटल एवढे उत्पादन होते.



अद्रक पिकासाठी आनंदवनने रासायनिक खतांचा वापर केला. शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे असे हे पीक असल्याचे शेतकऱ्यांनी ते घ्यावे.
- रामकृष्ण साटोणे, शेती विभागप्रमुख, आनंदवन, (जि. चंद्रपूर)



या पिकावर किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याने साठवणुकीसाठीही योग्य आहे. सुंठ म्हणूनही त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. अद्रकाची मागणी मोठी असल्याने शेतकऱ्यांनी एकदा या पिकाचा अनुभव घेतल्यास फायदा होईल. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बियाणेही उपलब्ध करू.


- प्र. अ. शास्त्रकार, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा (जि. चंद्रपूर)